वेंगुर्ला
ग्रामीण भागात मातीची घरे हि मोठी व जास्त खोल्यांची आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेच्या अटी शर्थी प्रमाणे त्यांना मंजुरी मिळत नाही व गोर गरीब, गरजू लाभार्थी या योजने पासून वंचित राहतात त्यामुळे या योजनेतील अटी व नियम बदलावेत, असा ठराव सभापती अनुश्री कांबळी यांनी मांडला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा बॅ नाथ पै सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसभापती सिद्धेश परब, गटविकास अधिकारी उमा पाटील-घारगे, सदस्य मंगेश कामत, शामसुंदर पेडणेकर, गौरवी मडवळ याच्यासह विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीस सदस्य स्मिता दामले यांचे वडील श्रीधर गोगटे व कुशेवाडा सरपंच यांचे पती यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. शालेय पोषण आहार चे जुलै पर्यंतचे धान्य देण्यात आले आहे व पुस्तक पुरवठा हि करण्यात आला आहे अशी माहिती गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांनी दिली.
चिपी विमानतळ उदघाटन सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सुरळीत पार पाडल्याबाबत व सध्या विमान सेवा सुरळीत चालू असल्याबाबत अभिनंदन करण्यात आले.१५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच कोविड कालावधीत गटविकास अधिकारी , अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले कार्य केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.