कुडाळ /-
पालकमंत्र्यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष न दिल्यास जिल्ह्यांमध्ये आल्यावर कर्मचारी व त्यांच्या बायका मुलांना घेऊन त्यांच्यासमोर आक्रोश आंदोलन करणार, असा इशारा मनसे राज्य परिवहन सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. नाडकर्णी यांनी दिला आहे.
सध्या दिवाळीपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सुरू असून त्याकडे पालक मंत्री, खासदार व आमदार यांचा जरासुद्धा लक्ष नसून फक्त विरोधकांची उणीधुणी काढण्याकडे वेळ वाया घालवताना दिसत आहे. एसटीचा प्रत्येक कर्मचारी हा पद्मश्री मिळावा इतका प्रामाणिक व स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणार आहे व ते लोकांनी करोना च्या काळात अनुभवलेले आहे.
अशा कठीण प्रसंगी सुद्धा जीवाची परवा न करता या लोकांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून काम बजावलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला व त्यातल्या त्यात कुडाळ तालुक्याला लोकांना अभिमान वाटावा, अशा माणसांनी पद्मश्री किताब मिळवला असला तरी खासदारांनी जेवढा वेळ त्यांच्या स्वागतासाठी खर्च केला त्यातले पाच टक्के वेळ त्यांनी जर का एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाण्यासाठी घालवले असते तर ते कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात राहिले असते. पालकमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दुजाभाव दिला व त्यांना जर कमी लेखण्याची चुकी केली तर त्याचा परिणाम त्यांना प्रत्येक निवडणुकीत दिसल्या शिवाय राहणार नाही. इतर सर्व गोष्टींकडे वेळ असलेल्या खासदार व पालक मंत्र्यांना जर का एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नसला तर जिल्ह्यामधील प्रत्येक एसटी आगरा मधून त्यांच्याविरुद्ध आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे.