दोडामार्ग /-
गणेशोत्सवाला येत्या १० सप्टेंबर पासून सुरवात होत असून त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल होणार आहेत.वाहनांची वर्दळ देखील वाढणार आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत असून वाहनांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.गेली सात वर्षे मनसे सातत्याने रस्त्यांवरील खड्यांविरोधात आवाज उठवत आले आहे,गणेशोत्सव जवळ आलेला असताना देखील दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था जैसे थे दिसत आहे तोक्ते चक्रीवादळानंतर अनेक ठिकाणची रस्त्यांवरील धोकादायक झाडे-झुडपे अजुनही तोडण्यात आलेली नसून दोडामार्ग -तिराळी-विजघर, दोडामार्ग-कळणे-बांदा तसेच तालुक्यातील अन्य रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.
सार्व.बांधकामच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांना लाल दगड न वापरता पावसाळी डांबर व रोलर वापरून ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत.तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे वाहतुकीसाठी अडचणीची ठरत असल्याने वाहनांना त्रासदायक ठरणारी दोन्ही बाजूची झाडी तोडण्यात यावी येत्या ३१ ऑगस्टपुर्वी रस्त्यांवरील खड्डे नबुजविल्यास व रस्त्या लगत असलेली झाडे नतोडल्यास दोडामार्ग मनसेतर्फे भीकमांगो आंदोलन करण्यात येईल व ३ सप्टेंबरला भीक म्हणून जमा झालेले पैसे आपल्या कार्यालयात शासनाकडे देण्यासाठी सुपूर्त केले जातील असा इशारा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे मनसे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी दिला आहे.