तनुश्रीच्या घरी जात दुर्ग प्रतिष्ठान ने केले पारितोषिक प्रदान..
कणकवली /-
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील इयत्ता सहावीमधील कुमारी तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील गट क्रमांक तीन ( ११ ते १४ वयोगटातील स्पर्धेत) द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय या मानाच्या कथाकथन स्पर्धेत विविध गटामध्ये राज्यातून ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तनुश्री हिने गट क्रमांक तीन मध्ये “गड आला पण सिंह गेला” या ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत कथाकथन सादरीकरण केले होते. या गटामध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सातारा, अहमदनगर, नागपूर, गोंदिया आदी जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यातील विविध भागातील प्राध्यापकांनी चिकित्सक परीक्षण करून कुमारी तनुश्री मसुरकर हिच्या कथाकथन स्पर्धेला द्वितीय पारितोषिक दिले.कोविड प्रादुर्भाव असल्याने या स्पर्धेचे बक्षीस वितरण लांबले होते. त्यामुळे नुकतेच कुमारी तनुश्री हिच्या राहत्या घरी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष सन्मा प्रकाश कावले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग अध्यक्ष सन्मा गणेश नाईक सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सन्मा प्रसाद सुतार सर यांच्या सुभहस्ते ग्रंथ साहित्य, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन आई वडीलांसमवेत गौरविण्यात आले. कुमारी तनुश्री हिला आई – वडील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे
कुमारी तनुश्री हिच्या या सुवर्णमय यशानिमित क ग शि प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा सतीशजी सावंत आणि पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा एल् डी सावंत आणि पदाधिकारी, प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी सर पर्यवेक्षक बुराण सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.