कणकवलीत शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ…
कणकवली /-
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या कोकणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री सोडाच, जरी पंतप्रधान दिला तरी कोकणात शिवसेना संपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. कणकवली येथे शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. १२ ते २४ जुलै या दरम्यान शिवसेनेने शिव संपर्क अभियान राबविले आहे. हे अभियान एकूण १२ दिवसांंचे आहे. शिवसेनेची निती ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी राहिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करून ओळखपत्र या देण्यात येणार आहेत. सामान्य शिवसैनिक म्हणून आपणही या संपर्क अभियानात सामील होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.