वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषद व वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डेंग्यू, हिवताप जनजागृती व प्रत्यक्ष डास निर्मूलन मोहिम कार्यक्रम राबविण्यात आला. सध्यस्थितीत पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढणार आहे. नागरिकांपर्यंत याची जनजागृती होण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. मच्छरांची वाढ ही झाडी वाढल्याने होत नाही. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या फुटकी भांडी, बॅरल, टायर यामध्ये साचलेल्या पाण्यांमध्ये मच्छरांची वाढ होते. यातील पाणी ७ दिवसांच्यावर राहिल्यास त्यात मच्छारांच्या अळ्या निर्माण होतात. तसेच घरातील कुलर, फ्रिज याच्या मागील भागात साठणा-या पाण्यामध्येही अळ्या निर्माण होता. त्यामुळे साठणारे पाणी ७ दिवसांच्या आत बाहेर ओतावे. मच्छरांचे निर्मूलन करण्यासाठी आठवड्यातून एकदा घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन आरोग्यसेवक आर.आर.नाथगोसावी यांनी केले. जनजागृती करताना ज्या वस्तूंमधून पाणी साठून मच्छरांची निर्मिती होते हे प्रत्यक्षरित्या दाखविण्यात आले. या जनजागृती मोहिमेत आरोग्यसेविका व्ही.व्ही.तांडेल व नगरसेवक विधाता सावंत सहभागी झाले होते.