मुंबई:आज मंत्रिमंडळाच्या पारपडलेल्या बैठकीत ठाकरे सरकार कडून मराठा आरक्षण बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली असल्याने व हे प्रकरण घटनापीठापुढे प्रलंबित असल्याने राज्य सरकार कोंडीत सापडलं. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी व मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आले. एसईबीसी (सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे.

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही, ईडब्ल्यएस प्रमाणपत्र देतांना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाचे आजचे आदेश सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकांमधील अंतरिम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णयही आज जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page