सिंधुदुर्ग /-
माझ्याविरुद्ध केवळ सुडबुद्धीने तक्रार करण्यात आली. पण मला काही अडचण नाहीय. मी शरण येणाऱ्यांपैकी नाही. मी मराठा आहे. आम्हाला राजकारण कोणीही शिकवू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही, मारणार नाही. विकासाचे प्रश्न सोडून इतर प्रश्नांकडे जनतेचं लक्ष वळवलं जात आहे. मराठी माणसांसाठी या सरकारने काय केलं? महाराष्ट्रात सुडबुद्धीची लोकं सत्तेवर आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात अशी सुडबुद्धी असणाऱ्या आणि कपट कारस्थान करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता ठेवू नका, अशी मी महाराजांना प्रार्थना करतो, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
आमच्या अधिश बंगल्याची एक इंचही जागा बेकायदेशीर नाही. बंगल्याची तक्रार करणारा मुंबईतला नव्हे तर सिंधुदुर्गातला कोकणी माणूस आहे. आम्ही सगळं कायदेशीर करतो. परंतु सुडबुद्धीमुळे तक्रार दाखल करण्यात आली. हे सुडाचं राजकारण आता बंद करा. छत्रपतींच्या नावावर यांनी केवळ धंदाच केला. छत्रपतींचं नाव घ्यायचं असेल तर लोककल्याणकारी राज्य तयार करा. ही दृष्टबुद्धी संपवा. मराठी माणसासाठी काहीतरी करा, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.