वेंगुर्ला /-
तालुक्यातील आरवली ते वेंगुर्ले मेनरोड या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून संबंधित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आरवली श्री देव दारुष्ट। येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आरवली व सागरतीर्थ गावातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता.दरम्यान आज गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आरवली येथे ग्रामस्थांची भेट घेत चर्चा करुन समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी पुकारलेले रस्तारोको आंदोलन स्थगित केले.यावेळी आज गुरुवारी सा.बां.विभागाचे अधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.त्यानुसार आंदोलनाच्या अनुषंगाने रस्त्यावरील वाढलेली झाडी स्वच्छ करण्यात आली आहे.रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी लागणारे साहित्य टाकण्यात आले आहे.२ डिसेंबर रोजी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करावयाचे होते.परंतु १ डिसेंबर रोजी रात्री पासून पाऊस पडत असल्याने काम सुरु करणे शक्य नाही.तरी सदरचे काम पाऊस थांबताच सुरु करण्यात येईल.तसेच येथील वार्षिक जत्रोत्सवापूर्वी संपूर्ण धोकादायक खड्डे बुजविण्याचा प्रयत्न राहील,असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन स्थगित केले.यावेळी सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव,माजी सरपंच विठोबा बागकर,आरवली सरपंच तातोबा कुडव,आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्ष मयूर आरोलकर,रविंद्र वराडकर,भगवान बागकर,पांडुरंग फोडनाईक,चंद्रशेखर तारी आदींसह सागरतीर्थ, आरवली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.