वेंगुर्ला /-
कोव्हिड काळात खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त साथ शेतकऱ्यांनी दिली,त्यामुळेच शेतकरी खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा ठरला आहे.युवा पिढीने शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच युवापिढीने नवीन रोजगार निर्मितीसाठी शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन वेंगुर्ले पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ले येथे केले.पंचायत समिती वेंगुर्ले व तालुका कृषी विभाग वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त “कृषिदिन” साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात सभापती अनुश्री कांबळी बोलत होत्या.पं. स. बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब,गटविकास अधिकारी उमा घारगे- पाटील, पं. स. सदस्या स्मिता दामले, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, पं. स. कृषी अधिकारी विद्याधर सुतार, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, संदेश परब, कृषी पर्यवेक्षक मराठे, केसरकर, ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर, सहाय्यक लेखा अधिकारी दिनकर चाटे, मातोंड ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर यांच्यासाहित इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी शुभदा कविटकर यांनी केले.यानंतर मठ ग्रामपंचायत येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तर येथील सखाराम ठाकूर व प्रकाश ठाकूर यांच्या शेतात हळद रोपे लागवड प्रात्यक्षिक व महेश सावंत यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळुसकर,कृषी सहाय्यक चव्हाण आदी उपस्थित होते.