नवी दिल्ली /-
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र, 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता संस्थेने 14 विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.