वेंगुर्ला /-
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळस गेली कित्येक वर्षे सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून जिल्ह्यात असलेल्या विविध संस्थांमध्ये वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरवर्षी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक दर्जेदार उपक्रम सातत्याने राबविले जातात. तसेच अश्वमेध महोत्सवाच्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रतिष्ठानचे हे बहुआयामी कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन वेंगुर्ले पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांनी समारोप प्रसंगी काढले.वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या ‘अश्वमेध’ दशावतार नाट्य महोत्सव समारोप कार्यक्रम संपन्न झाला,यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांच्यासह,होडावडा ग्रा. पं.सदस्या अनन्या धावडे, तुळस ग्रा.प. सदस्या हर्षदा नाईक, अभियंता अरविंद नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर व नाना राऊळ, सचिव गुरुदास तिरोडकर, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, निवृत्त पोलिस सुधीर चुडजी, नाटककार अशोक तेंडुलकर, निवृत्त मुख्याध्यापक बाबली परुळकर, संजय पाटील, बाबा राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.या दशावतार नाट्य महोत्सवात खानोलकर, कलेश्वर(सुधीर कलिंगण), नाईक मोचेमाडकर,पार्सेकर या दशावतार नाट्य मंडळांच्या नाट्यप्रयोगासह इंद्रधनू कलामंच,दाभोली यांची दशावतार कलेवर भाष्य करणारी एकांकिका, सप्तरंग कलामंच होडावडा यांची मालवणी एकांकिका आणि विविध कला अभिनयाचे कार्यक्रम पाच दिवस पार पडले.कार्यक्रम समारोप प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात पत्रकार आबा खवणेकर,दिपेश परब त्यांचा शाल,श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच ६० वर्ष दशावतार रंगभूमीची सेवा केलेल्या भाई सामंत (वय ८१वर्षे), खानोलकर दशावतारचे संचालक बाबा मेस्त्री, कलेश्वर दशवतारचे लोकराजा सुधीर कलिंगण, नाईक मोचेमाडकर दशावतारचे बाबल नाईक-मोचेमाडकर व तुषार नाईक-मोचेमाडकर, पार्सेकर दशावतार चे गौरव पार्सेकर, दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर, तुळस गावातील ज्येष्ठ दशावतार संतोष गोरे यांनी दशावतार कलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात गावात आशा स्वयंसेविका यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांनाही शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात रक्तदानाविषयी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्पमित्र महेश राऊळ यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.नाट्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.