सावंतवाडी /-

सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता, चोवीस तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी शहरातील नागरिकांना किमान मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. दरम्यान सावंतवाडी शहरात व्यवसाय करणाऱ्या मिनी टेम्पो चालक मालकांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसतर्फे आमचा पाठिंबा आहे. त्यांनाही पालिका प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीपत्रकात वंजारी म्हणाले, सावंतवाडी पालिकेत सध्या पाण्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी वेळ बदलण्याचे नाटक करण्यापेक्षा शहरातील लोकांना कशा पद्धतीने मुबलक पाणी मिळेल याचे योग्य ते नियोजन पालिका प्रशासनाने करावे. आपण स्वतः येथील उभाबाजार परिसरातील नागरिक आहे. या परिसरात शंभर फुटावर एकही विहीर नसल्यामुळे अनेक वेळा पाण्याच्या समस्येला परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्या, अशी त्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आम्ही बाहेरून आलेल्या व्यवसायिकांना विरोध करीत नाही. परंतु स्थानिकांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे येथील ठेकेदार, उद्योगपती यांनी स्थानिकांच्याच गाड्या भाड्यासाठी वापराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page