सिंधुदुर्ग /-
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या जामिनावर सुनावणी सुरू असून, ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. याच मानेशिंदे यांनी अभिनेता संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता.
आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू माजी खासदार निलेश राणे आणि वकील सतीश मानेशिंदे पोचले. न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरतदेखील बाजू मांडत आहेत. नितेश राणे कायदेशीरपणे शरण आले नसल्याने त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी घरत यांनी केली आहे. याला मानेशिंदे यांनी आक्षेप घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मानेशिंदे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मिळवून दिला होता. याचबरोबर अभिनेता संजय दत्तच्या खटल्यातही तेच वकील होते. त्यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र प्रकरणात जामीन मिळवू दिला होता. तसेच, त्याला टाडाच्या आरोपातून सोडवले होते. अनेक बॉलीवूड तारेतारकांचे खटले मानेशिंदे यांच्याकडेच असतात. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या प्रकरणातही तेच वकील होते.
नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे.
मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले. आता त्यांना अटक होणार की जामीन याचा फैसला सत्र न्यायालय घेणार आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुमारे पावणे दोन तास यावर सुनावणी सुरू असून नितेश राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी बाजू मांडताना ‘नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता’ अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली.
आज सकाळी ही सुनावणी सुरू झाली आहे. नितेश राणे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे हेही उपस्थित आहेत. तसेच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी हे सुद्धा उपस्थित असून आमदार राणे यांच्यावतीने प्रख्यात वकील संदीप मानशिंदे, संग्राम देसाई व अन्य वकील उपस्थित आहेत. यावेळी जामीन मिळण्यासाठी बाजू मांडताना संदीप मानशिंदे यांनी “पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे, ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता”, असे दिसत असल्याचे सांगितले.*तसेच ते पुढे म्हणाले की,नितेश राणे त्यांच्या स्वीय सहायकासोबत कितीही वेळा बोलू शकता. मी स्वतः माझ्या वकिलांशी दिवसातून जास्त वेळा बोलत असतो. नितेश राणे हे प्रसिद्ध व्यक्तीमहत्त्व आहे. त्यांचे अनेकांनी बोलणं होत असते. त्यांचा वावर बऱ्याच ठिकाणी असतो. अशामुळे त्यांचा आरोपींशी फोटो आहे याचा अर्थ असा होत नाही की ते त्यांच्या जवळचे आहे. नितेश राणेंकडून पोलिसांना सहकार्य मिळाले आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे. आता सरकारी वकील प्रदिप घरत यांच्याकडून युक्तिवादाला सुरूवात झाली आहे.तर न्यायालय काय निर्णय देईल हे स्पष्ट होईल.