चौके /-

मालवण – नेरुरपार कुडाळ रस्त्यावर काळसे ग्रामपंचायतीसमोर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातील काही खड्डे तर तब्बल एक फूट खोलीचे आहेत. त्यामुळे या रस्तावरुन वाहन चालवणे तसेच चालणे सुद्धा अवघड झाले आहे. सदर खड्डे पडून पाच महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अथवा स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजवले नाहीत. त्यामुळे या रस्तावरुन वाहतूक करताना सर्व वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थ मात्र त्रास सहन करत आहेत. या रस्त्यावरुन दररोज शेकडो वाहने ये जा करत असतात त्यामध्ये सायंकाळनंतर विनापरवाना ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांची संख्याही लक्षणीय असते. त्यावरही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडुन कारवाई होताना दिसत नाही याबद्दलही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक राजकीय कार्यकर्तेही यावर आवाज उठवत नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला असून येत्या १५ नोव्हेंबर पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने काळसे धामापूर गावातील मुख्य रस्त्यावरील काळसे ग्रामपंचायतीसमोरील आणि ईतर सर्व जीवघेणे खड्डे बुजवले नाहीत तर, २० नोव्हेंबर रोजी दोन्ही गावातील सर्वसामान्य नागरीक म्हणजेच राजकीय नेत्यांचे फक्त निवडणूकीवेळी लाडके असणारे मतदार रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत आणि काळसे ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर रास्ता रोको करणार आहेत. असा निर्वाणीचा ईशारा काळसे धामापूर मधील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. आणि त्यासंबंधीचे निवेदनही कार्यकारी अभियंत्यांना पाठविले आहे. सदर खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात झाल्यास कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल असाही ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page