स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर कोरोना योद्धे, गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे गुणगौरव..
आचरा /-
कोरोना महामारीच्या कठीण काळात चिंदर गावातील कोरोनायोद्ध्यांनी केलेली मदत आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्यामुळेच सद्यस्थितीत चिंदर गाव कोरोना मुक्त झाला असल्याचे मत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी चिंदर ग्रामपंचायत येथे व्यक्त केले.
७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळयात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,उपसरपंच दिपक सुर्वे, मंडल अधिकारी मेघश्याम पाटील, हडी सरपंच महेश मांजरेकर, डॉ शामराव जाधव, माजी सभापती हिमाली अमरे,अशोक बागवे, मनोहर घाडी, मधूकर पाताडे,महेंद्र मांजरेकर,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,क्रूषी सहाय्यक खराडे, पोलीस पाटील दिनेश पाताडे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सुब्रमण्यम केळकर,
दहावी, बारावी,टँलेंट सर्च परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांसह कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला गेला. यावेळी बोलताना माजी सभापती धोंडू चिंदरकर यांनी युवकांनी वाचन संस्कृतीतून आपली बुद्धिमत्ता वाढवावी.
केवळ राजकीय टिकाकार न होता त्या प्रक्रियेचा भाग बनून आपले योगदान देण्यास सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी कदम यांनी मानले.