कणकवली /-
आमदार नितेश राणे यांचा दुसर्यावर आरोप करणे हा धंदा असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगत नितेश राणे यांनी प्रथम स्वतःचे घर आणि कार्यकर्ते सांभाळावे दुसऱ्यावर आरोप करू नयेत. कारण 2019 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी माझ्या अनुभवा प्रमाणे कोणताही नवा -जुना असा कोणताही प्रकारचा वाद शिवसेनेत नाही, त्यामुळे आम.नितेश राणे यांनी शिवसेनेत भांडणे लावण्याचे काम करू नये. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक स्वतःला समजणाऱ्या नितेश राणे यांना स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर आजपर्यंतचे नितेश राणे यांनी टीका केली आहे त्यामुळे त्यांनी हा अधिकार केव्हाच गमावला आहे अशी टीका करताना शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा आम. नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षातील सचिन वाझे शोधावेत असा उपरोधिक टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. खासदार विनायक राऊत किंवा पालकमंत्री उदय सामंत आणि इतर सर्व पदाधिकारी हे एकत्र आहेत, त्यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही .किरण सामंत यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना सतीश सावंत म्हणाले, सन 2014 च्या निवडणुकीनंतर आम. नितेश राणे यांच्या सोबत किती सचिन वाझे आले याचा विचार त्यांनी करावा ,आजही जिल्हा परिषद, नगरपंचायती या ठिकाणी आम. नितेश राणे यांच्यासाठी काम करणारे अनेक सचिन वाझे आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांचे नाव घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी करू नये . जिल्हा परिषदेतील स्वतःचे सदस्य संभाळण्यासाठी नितेश राणे यांना पैसे दयावे लागतात, यावरून त्यांची पक्षातील निष्ठा दिसून येत असून त्यांनी प्रथम स्वतःच्या पक्षाचा विचार करावा आणि नंतरच शिवसेनेवर टीका करावी असाही टोला सतीश सावंत यांनी लगावला आहे.