कोल्हापूर /-


सर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. दुकान, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.करोना टाळेबंदीचे नियमावलीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत. अन्य व्यवसाय, व्यापार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत काल चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बुधवारी दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद केली होती. व्यापारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना न्याय द्या, या मागणीचे फलक हाती घेऊन आंदोलन केले. शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, शिवाजी चौक अशा मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुकाने बंद झाल्याने शहरातील वर्दळही कमी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page