सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत अधिसूचना जारी केलेली असून 12 डिसेंबरपासून नवीन दंड रकमेची कसूरदार वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांकडून ई-चलन प्रणालीद्वारे आकारणी केली जाणार आहे.

यापूर्वी असलेल्या मोटार वाहन कायद्यातील दंड रक्कम 200 रुपये प्रमाणे आकारणी केली जात होती. आता नवीन सुधारित अधिनियमानुसार ती रक्कम 500 रुपये प्रमाणे आकारली जाणार आहे. सुधारित नियमावलीत 16 वर्षांखालील मुले वाहन चालविताना आढल्यास 5000 रुपयांचा दंड, लायन्सस अपात्र चालक 10000 रुपयांचा दंड, नोंदणीशिवाय दुचाकी वाहन चालवणे 2000 रुपये (पहिल्या गुन्ह्यासाठी), दुसर्‍या गुन्ह्यासाठी 5000 रुपयांचा दंड, लायन्सस नसल्यास 5000 रुपयांचा दंड, दुचाकीचालवताना हेल्मेट परिधान केलेले नसल्यास 500 रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायन्सस निलंबित, वाहन चालवताना मोबाईल अगर दळणवळणाचे साधन यांचा वापर केल्यास 500 रुपयांचे दंड, एक दिशामार्गावर प्रवेश बंदी असताना प्रवेश केल्यास 500 रुपयांचा दंड, ट्रीपल सीटसाठी 1000 रुपयांच्या दंडासह तीन महिने लायन्सस निलंबित, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड, नो पार्किंग क्षेत्रात वाहन उभे केल्यास त्याचा दंड न्यायालयात भरावा लागणार आहे, अशी कठोर दंडात्मक कारवाई सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार कसूरदार वाहन चालकांवर केली जाणार आहे. वाहन चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणारे अपघात टाळण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page