माध्य. शिक्षणाधिकाऱ्यांना संघटनेचे लेखी निवेदन..

सिंधुदुर्ग /-

दहावी व बारावीचे मुल्यमापन आणि निकालाच्या कामासंदर्भात सुरू करण्यात आलेली माध्यमिक शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती निकाल जाहीर झाले तरीही तशाप्रकारे सुरू असून या उपस्थितीबाबत जिह्यात सर्वत्र गोंधळ सुरु आहे. शिक्षणाधिकारी यांनी याबाबत शासननिर्णयानुसार निश्चित धोरण जाहीर करावे, अशी लेखी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केली असून तसे न झाल्यास ९ आॅगस्ट सोमवारी क्रांतीदिनी धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी या निवेदनाव्दारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर व राज्य प्रतिनिधी सी. डी. चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या परिपत्रकाचा आधार घेत कोरोनाकाळातही होतोयं १०० टक्के उपस्थितीचा आग्रह…
संदर्भ जा. अमाशा/ सा. सु/२०२१/एस-१/१८७२ दि. १४ जून, २०२१ मा. शिक्षण संचालक

वरील संदर्भिय विषयास अनुसरून केवळ निकालाचे कामकाज वेळेत पूर्ण होण्यासाठी म्हणून इ. १०वी व १२ वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील, असे शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील संदर्भाने कळविले होते. इतर शिक्षकांना कोविड-१९ अंतर्गत नियमानुसार ५० टक्के उपस्थिती असेच शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व शाळेत उपस्थिती सुरू आहे. पण, सद्यस्थितीत दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले तरीही बहुतांश माध्यमिक शाळांतील १०वी व १२वीच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के संख्येने शाळेत उपस्थित राहण्याचा आग्रह केला जात आहे.

या उपस्थिती बाबत जिल्ह्यात कुठेही एकवाक्यता आढळून येत नाही. आम्हां शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीबाबत कोणतही हरकत नाही. पण, एक तर ५०% उपस्थिती अथवा १००% उपस्थिती याबाबत स्पष्टपणे शिक्षण विभागाने निश्चितधोरण राबवून एकवाक्यता आणावी. अशाप्रकारे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट लेखी आदेश काढावेत व उपस्थितीवरून निर्माण झालेल्या गोंधळाला पुर्ण विराम द्यावा. सदर आदेश न निघाल्यास सोमवारी दि. ९ ऑगस्ट, २०२१ रोजी दु. २ ते ४ या वेळेत आपल्या कार्यालयासमोर व कोवीड अंतर्गत असलेले शासनाचे सर्व नियम पाळून, धरणे आंदोलन करण्यात येईल, याची आपल्या स्तरावरून नोंद घ्यावी, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या लेखी निवेदनात शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी नमूद केल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page