भविष्यात नारळ तुटवडा होण्याची बागायतदारांकडून भीती
आचरा /-
माडबागायतीवर पुन्हा एकदा रुगोज चक्राकार पांढरया माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने माड बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. या माशीचा प्रादुर्भाव माडांच्या झावळ्यांवर होत असल्याने झावळ्यांमधील हरीतद्रव्यच शोषले जात आहे.त्यामुळे वृक्षांवर नवीन फलधारणाच होण्याची क्रियाच थांबली असल्याने भविष्यात नारळाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुळे नारळ व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. या बाबत कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माड बागायतदारांकडून होत आहे.
सध्या माडांच्या झाडांवर रुगोज चक्राकार पांढ-या माशींचा प्रादुर्भाव वाढल्याने माड बागायतदार संकटात सापडले आहेत.यामुळे माडांच्या हिरव्या झावळ्यावर काळ्या रंगाचा थर जमा होत असून वृक्षांच्या अन्न द्रव्यावरच घाला येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या मुळे माडावर फलधारणा होण्याची क्रियेमध्ये खंड पडला असून नारळ तुटवडा निर्माण होण्याची शक्यता माड बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. या बाबत माहिती देताना आचरा हिर्लेवाडी येथील माडबागायतदार प्रदिप पेडणेकर सांगतात मला वर्षाला पंधरा हजार नारळ मिळायचे पण आता दोन हजारही नारळ मिळत नाही आणि या रोगाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभर नारळ तुटवडा निर्माण होणार आहे.त्यामुळे नारळ व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या मुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तीन चार वर्षांपूर्वी केरळमधून आलेल्या या माशीचा प्रादुर्भाव माडबागायतींवर पुर्वी अल्प असा जाणवत होता.मात्र गेल्या वर्षी पासून या माशींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.मोठ्यामाड वृक्षांमुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी करणे शेतकऱ्यांना मोठे कष्टाचे ठरत आहे या मुळे माड बागायतदारांसमोर मोठे संकटच निर्माण झाले आहे.