✍🏼लोकसंवाद /- मालवण.
रक्त पिशवी किंमत वाढ प्रश्नी सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भावनेतून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.वाढीव दरवाढ स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आपण (राज्य शासनाने) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.तो म्हणजे शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या व रक्ताची गरज लागणाऱ्या सर्व रुग्णांना आता रक्त पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.हे निश्चितच स्वागतार्ह्य आहे,शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हा निश्चितच मोठा दिलासा मिळेल.मात्र याचवेळी दुसरा निर्णय असा घेतला आहे की, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्त पिशवी रुपये ४५०/- वरुन रुपये ११०० इतकी दरवाढ केली आहे. तथापि आम्ही आपल्या निदर्शास आणून देऊ इच्छितो की,अनेकवेळा काही सेवा या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत.अशावेळी खाजगी रुग्णालयातच नाईलाजाने रुग्णांवर उपचार केले जातात.जर रक्ताची गरज लागली तर या सुधारीत दराने सामान्य व गरिब रुग्णास रक्त घ्यावे लागेल. परंतु निश्चितच खाजगी रुग्णालयात जाणाऱ्या सामान्य व गरिब रुग्णांना ही दरवाढ परवडणारी नाहीय, त्यामुळे ही नवीन दरवाढ रद्द करुन जुन्या धोरणा प्रमाणेच ती ४५०/- रुपये अशी ठेवावी.
खेड्यापाड्यातील सामान्य व गरिब जनता नाईलाजाने किंवा अपरिहार्यपणे खाजगीत उपचार घेत आहेत, रक्ताचे शुल्क वाढवल्यामुळे हा अधिकचा भुर्दंड या जनतेस पडणार आहे.आपणास विनंती आहे की आपण या बाबीकडे अत्यंत संवेदनशीलतेने शासनाचा लक्षवेध करावा, तसेच सुधारीत वाढीव सेवाशुल्काबाबत स्थगिती देऊन ती खाजगी करिता पूर्ववत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा. अशी मागणी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वतीने राज्यशासन प्रशासकीय प्रतिनिधी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, तालुका उपाध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक, हर्षदा पडवळ, साक्षी मयेकर, आर्या गांवकर, शांती तोंडवळकर आदी उपस्थित होते.