✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील,विशेषतः शेतकऱ्यांच्या मुला-मुलीना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून कै.पुस्पसेन सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्या यशस्वी ही करून दाखवल्या.अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी कै.सावंत यांच्या समाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
माजी आमदार कै.पुष्पसेन सावंत यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त हुमरमळा येथील ‘पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ ‘संकुलात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
कै.सावंत यांचं हे महान कार्य त्यांचे चिरंजीव व इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन
सावंत हे निश्चितपणे आणि अधिक जोमाने पुढे नेतील असा विश्वास यावेळी तोरस्कर यांनी व्यक्त केला.
कै.सावंत यांचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत अनुयायी गंगाराम परब यांनी सावंत यांच्या राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेत त्यांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला.तत्वनिष्ठा आणि समाजसेवेचा त्यानी घेतलेला वसा यामुळेच आजही ते सर्वसामान्याच्या मनात घर करून आहेत.अशा शब्दात त्यांनी कै. सावंत यांचा कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांनी कै.सावंत यांच्या विधिमंडळातील अनेक आठवणी सांगत कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेला आमदार अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.कै.सावंत हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते असेही
ते म्हणाले.
आपल्या वडीलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेले हे कार्य आपण अधिक जोमाने पुढे नेऊ अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत सावंत यावेळी दिली.
यावेळी श्री मदन परब, कॅम्पस संचालक सौ.नूतन परब, माधवी शहापूरकर,अमित शहापूरकर,आर्या तानावडे, ज्ञानेश्वर मडूरकर, दिव्या परब,अक्षता सावंत, आदीनी कै.सावंत यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सौ.संगीता सावंत ,प्राचार्य युवराज पांढरे,अध्यापक वर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी संस्थेच्या आवारातील कै.सावंत यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
