✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २२४ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचेही अनेक सरपंच विराजमान झाले असून महाविकास आघाडीचा सुपड़ा साफ झाला आहे. विकासाच्या मुद्दयावर मतदारांनी भाजपवर विश्वास दाखविला असेल जनतेचा विश्वास सार्थकी लावणार अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक तथा अंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रथमेश तेली ,आदी उपस्थित होते.
राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचा झंझावात सुरू आहे.त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिल्याचे या निवडणुकीच्या निकालातून पून्हा सिद्ध झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव निलेश राणे, प्रमोद जठार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीला या निकालांच्या माध्यमातून यश आल्याचे दिसून आले.यापुढे होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षच नंबर वन ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.