कणकवली /-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक शक्ती केंद्रावर आणि वाड्या-वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जाणार आहे. त्याच बरोबर घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा प्रक्षेपण होणार आहे. याबाबतचे नियोजन मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. रविवार २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मतदार संघातील सर्व जनतेने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “मन की बात” प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी, पंतप्रधान आणि जनता यांच्यात थेट संवाद व्हावा यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा कार्यक्रम व्यापक स्वरूपात गावा-गावा पर्यंत, वाडी, वस्ती आणि प्रत्येक शक्ती केंद्रापर्यंत नेण्याचे नियोजन केले आहे. गावातील भाजपच्या प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुखाने ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या सहयोगाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. प्रत्येक गावात दोनपेक्षा जास्त ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. अनेक लोकांच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी अनेक कार्यालये, मध्यवर्ती ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे सज्ज करण्यात येत आहेत. हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधता येणार, याची उत्सुकता मतदारसंघातील जनतेला आता लागली आहे.