वेंगुर्ला /-

कुडाळ वेंगुर्ले दाभोलीमार्गे जाणाऱ्या मुख्य मार्गावर श्री देवी सातेरी मंदिर पासून काही अंतरावर वेतोरे खांबडवाडी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काल झालेल्या पावसामुळ मार्गावर शुक्रवारी एकूण १२ दुचाकी स्लिप झाल्या. तर सिलिंडर वाहतूक करणारी गाडी रुतून बसल्याने वाहतूक ठप्प झाली. अशी गंभीर घटना घडून गंभीर इजा अथवा मनुष्यहानी झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिला आहे.

वेतोरे, खानोली, वायंगणी, दाभोली या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर वेतोरे येथे पुलाचे काम सुरू आहे. पावसाळी हंगामापूर्वी हे काम पूर्ण करण संबंधित विभागाची जबाबदारी असूनही हे काम अगदी सुशेगाद सुरु आहे. मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून येथील पर्यायी मार्गाची बिकट अवस्था झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. टू व्हीलर, रिक्षा यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे येथे गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल समिधा नाईक यांनी केला आहे. याबाबत मागील महिन्यात परिसरातील ४ गावातील ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन केल्यानंतर हे अपूर्ण राहिलेले काम सुरु करण्यात आले. येत्या ८-१० दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास या मुख्य मार्गावरील गावांचा संपर्क तुटणार आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरुन त्वरित दखल घेऊन लक्ष पुरविण्यात यावे, अशी मागणी समीधा नाईक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page