मालवण /-
मालवण तालुक्यातील वायंगणी हायस्कुल मध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीने केला होता. या विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेस बसण्यास देऊ नये. या युवासेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर १९ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट मुख्याध्यापकांनी आज आपल्या ताब्यात घेत संस्थाध्यक्ष यांच्या ताब्यात दिली. मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यात मुख्याध्यापक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी युवासेना व संस्था पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तालुका युवासेनेच्या माध्यमातून काल त्या शाळेत धडक देत संपूर्ण कारभाराची पोलखोल केली होती. याप्रश्री ग्रामस्थ व संस्था पदाधिकारीही आक्रमक बनले होते. ३० एप्रिलला होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेस नियमबाहा प्रवेश असलेलल्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार नाही. मुख्याध्यापकांनी त्या मुलांना दिलेली हॉल तिकीट त्यांच्याकडून मागवून घ्यावी, अशी मागणी युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, सुजित जाधव, मंदार केणी यांनी केली होती. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिलेली हॉल तिकीट मागून घेण्यात आली. ही हॉल तिकीट संस्थाध्यक्ष सदानंद राणे यांच्याकडे देण्यात आली आहेत अशी माहिती युवासेना शहर प्रमुख श्री. ओरसकर व श्री. केणी यांनी दिली. दरम्यान तालुका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज वायंगणी शाळा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे.
मुलांची हॉल तिकीट मागून घेतली म्हणजे हे प्रकरण संपले असे नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यापूर्वीही असे प्रवेश देण्यात आले होते का ? याचीही चौकशी झाली पाहिजे, असे प्रवेश झाले असतील तर ते रद्द झाले पाहिजेत. संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्या बरोबर शिक्षण विभागाचे कोणी अधिकारी यात सहभागी आहेत का ? याचीही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेचे उदय दुखंडे यांनी केली आहे. तर याप्रश्नी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांचे लक्ष वेधून कारवाईची मागणी करणार असल्याचे श्री. दुखंडे यांनी सांगितले.
नियमबाह्य पद्धतीने पराजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय शाळा प्रवेश मिळण्यासाठी आमच्या शाळेत त्यांचे प्रवेश दाखवून शाळेची बदनामी करणाच्या मुख्याध्यापकांची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. अशी भूमिका संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांनी मांडली आहे.