कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबासह नऊ धरण प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तर येत्या दोन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असलेला निधी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील प्रलंबित धरण प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री.पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. दरम्यान टाळंबा धरणाचे काम हातात घ्या, , कमी उंची ठेवून हा प्रकल्प पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे टाळंबा धरणाचे काम थांबवणार नाही तर प्रकल्पाची ऊंची कमी करून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या झालेल्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे असे पाटील म्हणाले.