परुळे /-

सिंधुदुर्ग विमानतळावर तिकीट काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. प्रवाशांनी किमान दोन तास आधी विमानतळावर येणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गवासियांचा विमानसेवेला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती अलायन्स एअरचे मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी दिली.

सिंधुदुर्ग विमानतळावर दि. ९ ऑक्टोबरला अलायन्स एअरचे ७० आसनी विमान सुरू झाले आहे. मुंबईकडे जाणारे विमान सिंधुदुर्ग विमानतळावरुन दुपारी १.२५ वाजता सुटेल तर मुंबईहून सिंधुदुर्ग विमानतळावर येण्यासाठी सकाळी ११.३५ वा.विमान सुटेल. सुरुवातीपासून प्रवाशाचा चांगला प्रतिसाद विमानसेवेला मिळत आहे. मात्र स्थानिक प्रवासी विमानतळावर वेळेवर येत नसल्याने स्थानिक यंत्रणेवर काहीसा ताण पडत आहे.

समीर कुलकर्णी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार प्रवाशांनी विमानतळावर दोन तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवाशांनी एअर इंडियांच्या साईटवर जाऊन wab.checking या वेबसाईटवर जाऊन बोर्डींग पास घ्यावा. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्व विमानतळावर वेबवर जाऊन बोर्डिंग पास काढण्याची अट बंधनकारक केली आहे, असेही ते म्‍हणाले.

प्रवाशांनी बोर्डिंग पास काढला नाही तर विमानतळावर त्या बोर्डिंग पाससाठी १०५ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. एक प्रवासी प्रवासा दरम्यान १५ किलो लगेज (सामान) घेऊ शकतो व हातामध्ये ५ किलो सामान घेऊ शकतो. १५ किलोपुढील प्रत्येक किलोसाठी त्या प्रवाशाला ६०० रूपये अधिक त्यावर ३० रूपये जीएसटी मोजावे लागणार आहेत, अशीही माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.

विमानाच्या प्रवासा दरम्यान ३२ किलोच्या वर एकही लगेज (सामान) घेतले जाणार नाही. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायन्सस, इलेक्शन कार्ड यांपैकी एक अधिकृत ओळखपत्र सोबत आणावे आवश्यक आहे”, असेही कुलकर्णी यांनी स्‍पष्‍ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page