वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे गावाने सर्वांसमोर ठेवला एक नवा आदर्श..

वैभववाडी /-

आज देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७५ वा स्वातंत्र्य दिनाचे जिल्ह्यात सर्वत्र शासकीय कार्यालये, शाळांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. मात्र तालुक्यातील कुंभवडे गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने यावर्षीचा ध्वजारोहण सोहळा लोकप्रतिनिधींच्या हस्ते न करता बारावी परीक्षेत तालुक्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या अंकिता रमेश मुळये व विनिता राणे या दोन विद्यार्थ्यांनीच्या हस्ते केला. अंकीता ही ९५ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम आली होती तर विनिता ९७ टक्के मिळवत विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम आली होती. दोन्ही विद्यार्थीनी कुंभवडे गावच्या आहेत. त्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल त्यांना यावर्षीचा ध्वजारोहण करण्याचा बहुमान गावकऱ्यांनी दिला. वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे गावाने आपल्या कृतीतून सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिला.

यावेळी सरपंच मिलिंद गुरव, उपसरपंच विनोद कदम, माजी सभापती रमेश तावडे, ग्रा.प.सदस्य नंदु शिंदे, प्रमोद सावंत, पपा तावडे, सुरेखा चव्हाण, चैताली चाळके व गावातील सर्व शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page