आमदार नितेश राणेंचे मत्सोद्योग मंत्री अस्लम शेख यांना पाठवलेले पत्र व्हायरल…

अनधिकृत पर्ससिनेट व एल. ई. डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रूपये प्रमाणे १ कोटी ८० लाख रूपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रविंद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत, अशी लेखी तक्रार भाजपा आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यांचे बंधू किरण सामंत कोकणातील दुसरे सचिन वाझे अशी टीका आम. राणे यांनी पत्रकार परिषदेत केल्या नंतर हे तक्रारींचे पत्र व्हायरल होऊ लागले आहे.

पालकमंत्री याचे बंधू किरण सामंत यांच्या विरुद्ध आम. नितेश राणे यांनी केलेला पत्रव्यवहार आणि दिलेले पुरावे जनतेसमोर येऊ लागले आहेत. अनधिकृत पर्ससिनेट व एल. ई. डी. धारकांकडून किरण सामंत कसे पैसे वसूल करतात, याचा लेखा जोखा आम. राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांना दिला होता. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते, कोकण किनारपट्टीवर अनधिकृतरित्या होत असलेल्या मच्छीमारीबाबत विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पारंपारिक मच्छीमार सध्या फार मोठ्या संघर्षाद्वारे आपला निषेध वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत आहेत. पारंपारिक मच्छीमार व पर्ससिन मच्छीमार हा वाद जरी जुना असला, तरी सध्या हा वाद उफाळून येण्यामागे शासन निर्मित चाललेला भ्रष्टाचार हे एक कारण असल्याचे मला समजते. याबाबत सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील मत्स्य विभागातील काही अधिकारी व मच्छीमार यांचेकडून माहीती घेतली असता आपल्या खात्यामध्ये उघडपणे चाललेल्या भ्रष्टाचाराची धक्कादायक माहीती समोर आली आहे. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे २५ मार्च, २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचे पत्र आता व्हायरल झाले आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ३१५ अधिकृत पर्ससिनेट मच्छीमारांना परवाना देण्यात आला आहे. परंतु सध्या १५०० अनधिकृत पर्ससिनेटधारक तसेच ३०० एल. ई. डी. धारक बेकायदेशीररित्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मच्छीमारी करीत आहेत. या अनधिकृत पर्ससिनेट व एल. ई. डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रूपये प्रमाणे १ कोटी ८० लाख रूपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रविंद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत, असे समजते. त्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीला धरून प्रसंगी दबाव टाकून या वसूलीच्या कामाला जुंपले जात आहे. रश्मी अंबुलकर नावाच्या अधिकाऱ्याने ६० अनधिकृत पर्ससीन धारकांवर कारवाई केली असता, त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली, अशी माहीती आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून समजते. त्यामुळे अनधिकृत मच्छीमारी विरूद्ध कारवाई करण्यास अधिकारी वर्ग तयार होत नाहीत व यामुळेच संघर्ष निर्माण झाला आहे. अशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये राजरोस बेकायदा वसूलीचा प्रकार चालू आहे. त्याची दखल घेऊन या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आपण पोहचाल का ? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण वेळीच दखल घेऊन चौकशी करून संबंधित बेकायदा हप्ते वसूल करणाऱ्यांविरोधात लवकरच कारवाई करावी. अन्यथा कोकण किनारपट्टीवर पारंपारिक मच्छीमारांचा संघर्ष हा हिंसक मार्गावर जाईल व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी मत्स्य उद्योग मंत्री असलम शेख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page