वैभववाडी /-
वैभववाडी तालुक्यातील एडगाव ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचे वाढीव पाणीपट्टी बिल भरण्यास विरोध दर्शवला असून यासंदर्भातील निवेदन सरपंच रवीना तांबे व ग्रामसेवक उमेश राठोड यांना दिले आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, ग्रामस्थांना पिण्याचे मुबलक पाणी मिळाल्याशिवाय पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये. त्याचप्रमाणे हा निर्णय घेताना ग्रामसभा घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे येडगाव पवारवाडी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम गेली दहा वर्षे प्रलंबित असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पवारवाडी, रामेश्वरवाडी, इनामदारवाडी येथे मुबलक पाणी पुरवठा करावा. त्यानंतर पाणीपट्टीत वाढ करावे. ज्या ठेकेदारामुळे या योजनेचे काम रखडले आहे, त्याला नवीन कामे देण्यात येऊ नयेत. त्याचप्रमाणे त्याची देयके ग्रामपंचायतीने देऊ नयेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राजू पवार, बच्चाराम रावराणे, हेमंत रावराणे, प्रताप रावराणे, गोविंद घाडी, पोलीस पाटील अडुळकर, सचिन रावराणे, ललित रावराणे, निलेश रावराणे, महेश पाटील, प्रकाश पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.