सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या माध्यमातून कोकणचं वैभव, संपन्नता जगासमोर येईल उद्धव ठाकरे..

सिंधुदुर्ग /-

आजचा क्षण हा आनंदाचा आहे, आदळआपट करण्याचा नाही. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण यांचं नातं अतूट आहे. आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आज आपण कोकणचं महाराष्ट्राचं वैभव, संपन्नता जगासमोर नेत आहोत. हे विमानतळ कोकणच्या विकासासाठी खुप महत्वाचे ठरणार आहे, असे म्हणत
या जिल्ह्याला ज्या ऐतिहासिक किल्ल्याचं नाव दिलं गेलंय, तो सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. नाहीतर कोणीतरी म्हणेल की मीच बांधला, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला खुप सुंदर नैसर्गिक संपत्तीचा ठेवा मिळाला आहे. परंतु येथेही गोव्यासारखेच जगातले पर्यटक येण्याची आवश्यकता आहे. यासाठी सुविधा असणं गरजेचं आहे आणि त्या सुविधांमधल्या सगळ्यात मोठा भाग असलेल्या विमानतळाचं आज लोकार्पण झालेलं आहे. यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, की कॅलिफोर्निया ला अभिमान वाटेल असं कोकण मी उभं करेन. त्यासाठी पर्यटन वाढणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. या विमानतळाच्या ठिकाणी आता हेलिपोर्ट झालं पाहिजे. जेणेकरून पर्यटकांना सागरकिनाऱ्याची तसेच इथल्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक गोष्टींची सफर करता येईल. नारायण राणे तुम्ही अनेक गोष्टी केल्यात. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे. पण ती भयभीत होणारी नाही. त्यामुळेच विनायक राऊत आज खासदार म्हणून उभे आहेत. तुमच्या केंद्रीय मंत्री पदाचा उपयोग तुम्ही महाराष्ट्रासाठी नक्की करून द्याल, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. विकासामध्ये मी कुठेही पक्षभेद आणत नाही. आणि ती इतरांनाही आणू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page