मुंबई /-
राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चाही सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी राजकीय चकमक झडताना दिसत असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला चितपट करणार असल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला. तीनही पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. अरुण लाड व जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरवात झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरू होणार असून, त्याचाही आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले,”राज्यात पाच जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पाच ही जागांवर आम्ही निवडून येऊ. आम्ही तिन्ही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठं जायच तसं ठरलेलं आहे. देशात आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. कोविडच्या आधी आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे यातून बाहेर काढणे गरजेच आहे. आमचं सरकार ते करेल,” असं पाटील म्हणाले.