निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ..

कुडाळ /-

गेल्या १० वर्षात प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकरयांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली त्यामुळे भाताचे उपन्न वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱयांनी लाभ घ्यावा. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पैसे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होतील. तसेच कृषीविषयक इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल त्याचप्रमाणे यावर्षी उच्चांकी भात खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.गतवर्षी शासनामार्फत ३६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आले यावर्षी ६०हजार क्विंटल भात खरेदी करण्याचा संकल्प असल्याचे कुडाळ मालवणचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जि. प. गटनेते नागेंद्र परब,जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नामदेव गवळी, जि.प. सदस्य राजू कविटकर, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, सदस्य श्रेया परब, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, बजाज राईस मिलचे मॅनेजर संदीप चव्हाण, कृषी पर्यवेक्षक निलेश उगवेकर, प्रभाकर वारंग, निवजे सोसा. चेअरमन सूर्यकांत सावंत, शाखा प्रमुख संतोष पिंगुळकर,राष्ट्रवादीचे शिवाजी घोगळे, शेतकरी महादेव पालव, दत्ता सावंत,श्री, आळवे, सीताराम पालव, श्याम पिंगुळकर सुधीर राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. .यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव लागू करण्यात आला आहे. तसेच बोनस स्वरूपात गतवर्षी पेक्षा जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे या ग्रामीण भागातील सोसायटीमध्ये प्रथम भात खरेदीचा शुभारंभ केला त्याबद्दल जि. प. गटनेते नागेंद्र परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. उपसभापती जयभारत पालव, सदस्य श्रेया परब यांनीही मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page