सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्गात राजकीय धुमशान पाहायला मिळत आहे. दीपक केसरकरांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. ‘नारायण राणेंमध्ये कुवत होती म्हणून त्यांना शिवसेनेत पदे मिळाली. केसरकरांमध्ये कुवत नसल्यामुळे शिवसेनेने राज्यमंत्रीपदही काढून घेतलं. केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावर नागोबा आहेत’ अशा शब्दात भाजपचे सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांची दीपक केसरकरांवर टीका केली आहे.
दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चांनंतर केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. ‘मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं’ अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.
*राणेंना टोला*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा’ असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. उंदीर आणि टोपीची उपमा देत दीपक केसरकर यांची राणेंवर निशाणा साधला.’ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का?’ असा प्रश्नही केसरकरांनी उपस्थित केला. अशा लोकांकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष देऊ नये, असंही केसरकर म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना केसरकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (मनोहर पर्रिकर) यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही’ असा गौप्यस्फोट माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.