मुंबई-६सप्टेंबर.
मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.मुंबई-नागपूर या ७०१ किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा ६२३ किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबईपर्यंतचे काम पूर्ण होईल.
सरकारला २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा २०२१ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता १८ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
कसारा घाटात ८ किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी २ किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठपदरी असून त्यावर वाहनांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत असणार आहे.
महामार्गाची वैशिष्ट्ये
५० हून अधिक उड्डाणपूल
२४ हून अधिक इंटरचेंज
५ पेक्षा जास्त बोगदे
१० जिल्हे, ३९१ गावे मार्ग जाणार
इतर १४ जिल्ह्यांना फायदा होणार.