✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.
जिल्ह्यातील कातकरी समाजाला घरांसाठी प्राधान्याने शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांन दिले.
जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी विविध योजना राबविण्यासाठी बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी सविस्तर आढावा दिला. जिल्ह्यात एकूण २५९ कुटुंबे असून ८२४ लोकसंख्या आहे. त्यापैकी १५७ कुटुंबाना घरकुले नाहीत, असे त्यांनी सांगितले.याबाबत पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये प्रस्ताव तयार करता येत असतील तर ते करावेत. त्याचबरोबर शासकीय जमीन प्राधान्यांने त्यांनी द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी पाहणी करावी तसेच यावर मार्ग काढा.
