मुंबई /-
“राज ठाकरे हे भाजपाचा भोंगा आहे. ‘ईडी’च्या कारवाईमुळे राज ठाकरे यांचा भोंगा सुरू आहे.अल्टिमेट महाराष्ट्राला कुणी देत नाही.ती ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती.काल ठाणे येथे जो भोंगा वाजला, तो भाजपाचाच भोंगा होता. हिंदुत्व हे शिवसेनाच्या रक्तातच आहे. वैफल्य आणि निराशा आल्यामुळेच हे भोंगे वाजत आहेत.ईडी कारवाईतून सूट मिळाल्यामुळे हा भोंगा वाजत आहेत”, अशा शब्दात राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
“सोमय्यांबद्दल वापरलेल्या शिवराळ भाषेचा शिवसेनेला गर्व आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, दिल्लीत कारस्थानं सुरू आहेत. सोमय्यांना दिलेल्या शिव्यांबद्दल जनता मला माफ करेल. किरीट सोमय्यांना तुमच्या शिवतीर्थावर बोलावून त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा. तुमची अक्कल दीड वर्षे ‘ईडी’कडे गहाण पडली होती, हे आम्हाला माहीत आहे”, असा टोलाही संजय राऊत लगावला.
“ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं, असं प्रबोधनकार ठाकरे, प्र. के. अत्रे यांनी म्हटले होते. हीच आमची दैवतं कायम आहे, तुम्ही तुमचा म्हसोबा बदलला आहे. त्यामुळे तुमचे भोंगे जनता बंद करेल”, असेही ते म्हणाले.
