दोडामार्ग /-
जुलै महिन्यात कळणे खाणीत बेकायदा करून ठेवलेला पाण्याचा साठा बाहेर काढण्यासाठी मशिन लावून खोदकाम करून कळणे खाणींचा बांध फोडून गावातील शेतकऱ्यांना शेती बागायती जमीन यापासून वंचित ठेवून झालेली कोट्यावधी रुपये नुकसान भरपाई देखील अजून शेतकऱ्यांना दिलेली नाही संबंधित अधिकारी या कंपनीच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची चौकशी व्हावी तसेच कळणे खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनीने धाडस करु नये असा इशारा शिवसेनेचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
कळणे खाण प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावा तसेच या ठिकाणी वन हद्दीला लागून बेकायदा उत्खनन केले जात आहे. मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन कळणे खाण प्रकल्प बंद करावा अशी मागणी करणार असल्याचे बाबुराव धुरी यांनी सांगितले.