मठ गावातील वादळग्रस्तांना तातडीची मदत तसेच बोवलेकरवाडी येथील पुल नुतनीकरण होण्यासाठी केली मागणी..
सिंधुदुर्ग /-
१६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले .सुमारे १०० ते १५० घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले.तसेच चक्रिवादळामुळे उत्पन्न देणारी झाडे जमीनदोस्त झाली.
वेंगुर्ले – बेळगाव रस्त्यावर झाडे व विजेचे खांब पडल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली .त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बोवलेकर वाडीतील नादुरुस्त पुलावरून वाहतूक सुरू केली.परंतु कित्येक वर्षे ग्रामस्थांची बोवलेकर वाडी येथील पुल करावा अशी मागणी असताना निधीची अनुपलब्धता असे कारण सांगुन ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली.ज्यावेळी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु झाल्यावर ग्रामस्थांनी जवळ जवळ चार तास रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट देऊन आपण या प्रश्नी जिल्हाधिकारी यांचेशी भेट येऊन मार्ग काढुया असे अभिवचन ग्रामस्थांना दिल्यावर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.आज १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मठ सरपंच तुळशीदास ठाकुर व ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच तातडीने बोवलेकर वाडी येथील पुल तसेच अॅप्रोच रोड दुरुस्तीची मागणी केली . त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब वेंगुर्ले तहसिलदार यांचेशी संपर्क करुन नुकसानीचा अहवाल मागवला व जास्तीत जास्त वादळग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासीत केले.त्यानंतर याच शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त पाहणी दौरा करून पुलाची व रस्त्याची तातडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली असता येत्या दोन दिवसातच संबंधित अधिकारी मठ गावात येऊन संबंधित पुलाची पाहणी करतील असे आश्वासन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले.भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मठ गावातील दुर्लक्षित प्रश्नांना चालना दिल्याबद्दल मठ सरपंच तुळशीदास ठाकुर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, युवा नेते अजित नाईक, बुथप्रमुख अनिल तेंडोलकर, युवा मोर्चा चे समीर नाईक, मठ ग्रामसेवक केळुसकर आदी उपस्थित होते.