देवगड येथे महिला बचतगट मार्गदर्शन मेळावा संपन्न

देवगड /-

महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने हाती घेतलेले कार्य आदर्शवत आहे. असे मत देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी व्यक्त केले. देवगड येथील हॉटेल डायमंड हॉल मध्ये युथ वेल्फेअर असोसिएशन आणि स्वयंसिद्धा फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस एन म्हेत्रे, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अधिकारी शंकर चाटे, उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे देवगड तालुका व्यवस्थापक शिवाजी खरात, महाराष्ट्रातील बचत गट चळवळीतले अग्रणी स्वयंसिद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण पैठणकर, सचिव विजय जोशी, युथ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर, सचिव रुपेश घाडी, सहसचिव रऊफ काझी, संस्था सदस्य राजेश बांदिवडेकर, मनीष सागवेकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे पुढे म्हणाले की, कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणाचा महिला भगिनी हा मुख्य पाया ठरू शकते यासाठी प्रत्येक महिलेने यशस्वी उद्योजक बनण्याची आवश्यकता आहे. संस्थेने यासाठी उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे ते म्हणाले. यावेळी वंदे मातरम सहकारी पतसंस्थेची संस्थेचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांच्याकडून घोषणा करण्यात आली. याप्रसंगी तेजस घाडीगावकर म्हणालेत की, संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि विशेषता महिला भगिनींचा आर्थिक विकास साधण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना सुयोग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक करता यावी आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता यावा यासाठी वंदे मातरम सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दराने देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना युवकांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे. यावेळी तेजस घाडीगावकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला व त्यांची उद्योजक होण्या बद्दलची मते जाणून घेतली. यावेळी बोलताना भूषण पैठणकर यांनी महिलांना यशस्वी उद्योजक होण्यासाठीची चारसुत्र उलगडून सांगितली. यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्या उद्योगाबाबत योग्य प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या उद्योगाच्या उभारणीसाठी बीज भांडवल सोबतच आर्थिक व्यवस्थापनाची देखील गरज आहे. उत्पादित मालाला बाजारपेठ असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. याबाबत महिला भगिनींना मदत करण्यासाठी युथ वेलफेअर असोसिएशनचे कार्यकर्ते नेहमीच आपल्या साठी तत्पर आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी वंदे मातरम सहकारी पतसंस्था मैलाचा दगड ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना विजय जोशी म्हणाले की, घरातल्या गृहिणीला मांजर समजल जात; परंतु आपण तिची शक्ती किंबहुना तिच्यातील क्षमतेची जाणीव तिला करून दिली तर ती वाघीण आहे हे सर्वांना नक्कीच दिसून येईल. सीआरपिनी महिला बचत गट सक्षम करताना गटातील अंतर्गत कुरबुरी संपून त्यांना एक दिशा एक स्वप्न दाखविले पाहिजे. महिलांमध्ये बचत गटांच्या पुढे जाऊन स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इच्छा जागृत करण्याची गरज आहे. बचत गटांच्या प्रगतीच्या आड अनेक समस्या येत आहेत. यामध्ये माहितीचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता, जोखीम स्वीकारण्याबाबत कमतरता, दिशाहीनता, आपापसातील हेवेदावे आणि कामगारांची मनोवृत्ती कारणीभूत आहे असे ते म्हणाले. उत्कृष्ट उद्योजक बनण्यासाठी तंतोतंत माहिती असणे, प्रचंड सकारात्मकता व आत्मविश्वास असणे, जोखीम स्वीकारण्याची तयारी असणे अशा गुणांची आवश्यकता आहे. बचत गटांनी विखुरले पणातून विविध व्यवसाय करण्यापेक्षा एकच मोठा व्यवसाय करावा. ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक गावी एक मार्केटिंग हब बनवून तिथे गटाचे प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवावे. अशा पद्धतीने काम करता आले तर यामधून कॉमन रॉ मटेरियल बँक निर्माण करता येईल. गटातील भांडवल एकत्रित गुंतून उद्योगासाठी मोठे भांडवल उभारता येईल आणि या सगळ्याला एका मोठ्या कंपनीचे स्वरूप देता येईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस एन म्हेत्रे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना संस्थेच्या सहकार्यातून कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका व्यवस्थापक शिवाजी खरात आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अधिकारी शंकर चाटे यांनीदेखील उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page