सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता तातडीने नुकसान भरपाई द्यावी..
दोडामार्ग /-
कळणे येथील दुर्घटनेला दोन महिने होत आले, तरीही येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. शासनाने पंचनामे केलेत परंतु अजून त्या पंचनाम्यानुसार आम्हाला भरपाई दिली नसून हा सर्व नुकसानग्रस्त गरीब शेतकऱ्याच्या भावनांसोबत खेळण्याचा प्रकार आहे. आमचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि सरकारने केलेले जे काही पंचनामे असतील ते आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मान्य आहेत. परंतु सरकारने लवकरात लवकर याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांनी केली आहे.
ही दुर्घटना झाल्याने आज येथील शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास याची जबाबदारी कोणाची ? येथील नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई मिळून संसार गाडा चालू राहिल, अशी आशा ठेवून आहे. मात्र दोन महिने उलटत आले तरीही नुकसान भरपाई मिळण्याबाबत काहीच हालचाल दिसत नाही. कळणे गावातील ही हृदयद्रावक परिस्थिती विचारत घेऊन सरकारने आमच्या भावनांचा विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अभय देसाई यांनी केली आहे.
