मुंबई /-

 महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून याविषयावर भाष्य केले आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.

ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटते आहे व तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ईडी आणि सीबीआयच्या नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमाकावले आहे. ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पण चंद्रकांत पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?’असा सवाल शिवसेनेने केला आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता,’ईडीशी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अंहकार आहे. आमची वर सत्ता आहे, आम्ही काहीही करु शकतो, अशी भाषा चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही,’शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार एकदम भूतकाळात गेले व म्हणाले, त्या काळात अनेकदा वाद झाले. मृणालताई असताना सदनामध्ये अनेकदा वाद व्हायचे, पण ते राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असलेला पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते. पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत,’एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे,’‘पाटील म्हणाले, सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचे सुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page