देवगड /-
कोविड- १९ च्या संक्रमण काळात मिठबाव व आजूबाजूच्या परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी फेऱ्या गेले काही महिने बंद असून सद्यस्थितीत शासन प्रशासनाच्या आदेशानुसार काही प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मिठबाव येथेही एस. टी. च्या प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात. तसेच देवगड-मिठबाव-तांबळडेग-फोंडा ही (सकाळी ८.१५ वा.) प्रवासी फेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी मिठबाव सरपंच भाई नरे यांनी देवगड आगार व्यवस्थापकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांना देण्यात आली आहे. यावेळी सरपंच भाई नरे यांच्या समवेत नगरसेवक नीरज घाडी, चंदन घाडी, जया मुणगेकर उपस्थित होते. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे वस्तीच्या प्रवासी फेऱ्याकरीता चालक वाहक यांची निवास तसेच प्रसाधनगृह व्यवस्थाही निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
