नवी दिल्ली /-
सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी आधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी संघटनांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संसदेच्या बाहेर केंद्रीतील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहे.
भारतीय किसान यूनियनशी संबंधित शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये हरयाणा, तेलंगना, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय किसान यूनियनचे नेते गुरनाम सिंह यांनी दिली आहे.
हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी शेती संदर्भातील तीन अध्यादेशांचा विरोध करण्यासाठी आज संसदेबाहेर धरणं आंदोलन करणार आहेत.याचबरोबरच पंजाबमधील भाजपाचा मित्र पक्ष असणारे शिरोमणि अकाली दलही या अध्यादेशांवर नाराज असल्याचे दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिरोमणि अकाली दल या अध्यादेशांच्या विरोधात मतदान करणार आहे.