सावंतवाडी /-
तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणाला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने केवळ गुजरात राज्याच्या दौरा करत गुजरातला १ हजार कोटीची भरीव मदत जाहीर केली. परंतु कोकणचे एवढे नुकसान होऊन देखील ते कोकणात येत नाही हे आश्चर्यकारक आणि दुर्देवी असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते आणि सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोकणची जनता हे या देशाची नागरिक नाही का? देशाचे पंतप्रधान हे फक्त गोव्याचेच पंतप्रधान आहेत का? असला दूजाभाव का? असे प्रश्न त्यानी उपस्थित केले आहेत. यासाठी जिल्ह्यातील आणि राज्यातील भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारतील का ? असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौऱ्यावर असून, आज – उद्या ते सिंधुदुर्गात देखील येतील. यावेळी त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान कोकणात का आली नाहीत आणि केंद्र सरकारने कोकणला किती मदत केली? याची उत्तरे द्यावीत. फक्त राजकारण करण्यासाठी कोकण दौरे करू नये अशी टीका डॉ. परुळेकर यांनी भाजप वर केली आहे