कुडाळ /-

शाळेतील शेवटचा वर्ग संपला तर मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. मार्च २०२० पासून कोवीडच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी ते सातवीच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात उशिरा झाली. एप्रिल महिन्यात शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप दिला जातो. पण यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच अचानक लाॅकडाऊन जाहीर झाल्याने सातवीच्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये निरोप समारंभ घेणे शक्य झाले नसल्याने बांदा केंद्रशाळेतील सातवीतून आठवीत जाणार्‍या १८ विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्स गृपच्या माध्यमातून लाईव्ह ऑनलाईन शुभेच्छापर निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बांदा केंद्र शाळेच्या वतीने गेले वर्षभर शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा यासाठी ऑनलाईन सहशालेय उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर विविध ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे. नुकत्याच १ मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन केले होते.

शाळेने ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप देण्याचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम नुकताच पार पाडला. हा ऑनलाईन निरोप व शुभेच्छा समारंभ कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सारा शेख या विद्यार्थीनीने सुमधूर आवाजात स्वागतगीत गायन केले. उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केले. सुरवातीला सातवीच्या वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील पहिली ते सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांपैकी सानवी महाजन व सानिका नाईक या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. सातवीतून आठवीत जाणार्‍या स्नेहा निंबाळकर, शौर्य पाटील व सिमरन तेंडोलकर या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. पालक प्रतिनिधी म्हणून वंदना पाटील, ज्योती तेंडोलकर व गौरी बांदेकर यांनी आपले मनोगते व्यक्त केलीत. शिक्षक प्रतिनिधी म्हणून शुभेच्छा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांपैकी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले संदीप तेंडोलकर यांनी बेलापूर मुंबईहून, बांदा केंद्रप्रमुख संदीप गवस, बांदा प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, मुख्याध्यापक सरोज नाईक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधनात्मक मोलाचे मार्गदर्शन केले. आभार उपशिक्षक रंगनाथ परब यांनी मानले. चैतन्या तळवणेकर या विद्यार्थीनीने सादर केलेल्या वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षक जे. डी. पाटील, रसिका मालवणकर, वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील सर्वात मोठी पटसंख्या असलेल्या शाळेत राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page