लोकसंवाद /- मालवण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर माफी मागायला येतील अशी मुक्ताफळे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे येत उधळली आहेत. बिनकामी विनायक राऊत हे शिवसेनेला कलंक होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने शिवसेना वाचली आणि विनायक राऊत हे बेरोजगार झाले आहेत.मातोश्रीवरची उरली सुरली वसुलीची कामे तरी आपल्याला मिळावीत यासाठी त्यांची ही उद्धव ठाकरेंची भाटगिरी चालली आहे.
जिल्ह्यात एकही प्रकल्प आणता आला नाही, फक्त भाजपाच्या केंद्रातील कामांचे श्रेय घ्यायला राऊत धडपडतात.आयुष्यभर विमानतळाला विरोध करणारे विनायक राऊत उदघाटनाला मात्र घरचे बारसे असल्यासारखे नारायण राणेंना पेढे वाटण्याइतके कोडगे आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिले आहे.उद्धव ठाकरेंना दिवास्वप्नात रंगवून ठेवायचे आणि आपला स्वार्थ साधायचा असल्या विनायक राऊत स्टाईल सोनसाखळी स्वार्थीपणामुळे मातोश्रीची वाट लागली आहे.एकनाथ शिंदे हे आजही मुख्यमंत्री आहेत हे राऊत विसरत आहेत.ते यापुढे माफी मागायला नव्हे,तर तुमच्या सारख्या हुजऱ्यांच्या खासदारकीला शेवटचे कुलूप लावायलाच येतील, हे राऊतांनी लक्षात ठेवावे.
यापुढे त्यांनी शिंदे साहेबांच्या राजकारणावर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तळगावच्या भजनी डबलबारीकडेच काय तो लक्ष द्यावा आणि उर्वरीत आयुष्य हरिभजनात कंठावे असे प्रतिउत्तर शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी दिले आहे.
