कुडाळ/-
सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर येथील विमानसेवा रविवार पासुन सुरू झाली असुन आज (रविवार) मुंबईवरून ६७ तर सिंधुदुर्गवरून ५६ प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला.
सिंधुदुर्ग चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यामुळे आता या ठिकाणी मुंबई- सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग- मुंबई अशी विमान सेवा नियमित सुरू राहणार आहे. केंद्र सरकारच्या प्रादेशिक संपर्क योजनेंतर्गत (उडान) ही सेवा सुरू केली जात असून, एअर अलायन्स मुंबई-चिपी आणि चिपी मुंबई हा अनुक्रमे ७४ आणि ७५ वा मार्ग खुला करण्यात आला आहे. मुंबई – चिपी-मुंबई प्रवासाकरिता ‘एटीआर ७२६००’ हे विमान तैनात केले असुन त्याची आसन क्षमता ७० इतकी आहे.
९ आय ६६९ क्रमांकाचे विमान दररोज सकाळी ११.३५ वाजता मुंबई विमानतळावरून येणार आहे. आणि दुपारी १ वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल, तर ९ आय ६६२ क्रमांकाचे विमान सिंधुदुर्गहून दुपारी १.२५ ला निघून २.५० ला मुंबईत दाखल होणार आहे.
दरम्यान आज (रविवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ६७ प्रवाशांना घेऊन अलायन्स एअरचे विमान मुंबईहून आले.त्यानंतर दुपारी २ वाजता सुमारे ५६ प्रवाशांना घेऊन हे विमान मुंबईकडे रवाना झाले. सध्यातरी या या विमान वाहतुकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक दिवसांपर्यंत प्रवासी बुकिंग झालेले असल्याची माहिती विमान प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली.
